सातारा -सातारा वन विभागाने कास पठारावर सुरू केलेली “नाइट सफारी’ सुरू होतानाच वादात सापडली आहे. पर्यावरणवादी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी या नाइट सफारीला राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान देण्याची तयारी चालवली आहे. यामुळे परिसरातील वन्यजीवन व अन्नसाखळी संपुष्टात येणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत असून तशा स्वरूपाचा मसुदा तक्रार लवादाकडे दाखल करण्यात येणार असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी सांगितले.
सातारा वनविभागाने कास आणि परिसरामध्ये दोन वाहनांच्या माध्यमातून दि. 20 रोजी रात्री ही सफारी सुरू केली. वन विभागाकडे नाइट पेट्रोलिंगच्या कार्यवाहीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे नाइट सफारीचा मुद्दा समोर आला. पेट्रोलिंग जीपच्या मार्गानेच पर्यटक रात्रीच्या वेळी जाणार असल्यामुळे अंतर्गत जंगलात पर्यटक जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही असा दावा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केला. या मुद्द्याला अनुसरून त्यांनी नाइट सफारीचे आयोजन केले असून आठ जणांच्या सफारीसाठी चार हजार रुपयांचे शुल्क ठेवण्यात आले आहे. कास ते जुंगटी असा तीन तासाचा प्रवास या सफारीत असणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सायंकाळी सात ते दहा अशी ही नाईट सफारी आयोजित करण्यात आली असून शुक्रवारी पुणे आणि साताऱ्यातील दोन ग्रुपची नोंदणी झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र, पर्यावरणवाद्यांनी या सफारीला तीव्र आक्षेप घेतला असून सजग नागरिक मंच सवयभान चळवळ आणि ड्रोंगो ग्रुप यांनी या नाइट सफारीला आक्षेप घेतला. पर्यावरणवाद्यांनी आपला आक्षेप लेखी पत्राद्वारे वन विभागाकडे नोंदवला आहे. मात्र, तरीही वन विभागाच्या नाइट सफारीला सुरुवात झाली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी थेट हरित लवादाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी चालवली आहे. लवादाने या प्रश्नात हस्तक्षेप केल्यास भविष्यात होणारी पर्यावरणाची हानी, तेथील प्राणी आणि अन्नसाखळी यांना होणारा धोका संपुष्टात येईल, असा लेखी आक्षेप संतोष शेंडे यांनी नोंदवला असून तसा पत्रव्यवहार ते राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील कार्यालयाशी करणार आहेत,अशी याची माहिती त्यांनी दिली.
रात्रीच्यावेळी वन्य श्वापदांचा अधिवास आणि त्याची साखळी या सफारी फार प्रभावित करणार आहेत. मुळात रात्रीच्या वेळी प्राण्यांच्या क्षेत्रांमध्ये नाइट सफारी करणे अशास्त्रीय आहे. या सफारीच्या माध्यमातून अन्नसाखळी विस्कळीत झाल्या तर मानवी क्षेत्रात सर्व प्राण्यांचा वावर धोकादायक पद्धतीने वाढणार आहे. अशा अशास्त्रीय नाइट सफारीतून रोजगार मिळाला तरी पर्यावरणाचे संतुलन धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजगार हवा असेल तर काही वेगळे मार्ग काढण्यासंदर्भात संघटनात्मक पातळीवर चर्चा केली जावी.
सुनील भोईटे, मानद वन्यजीव संरक्षक