मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सामन्यांची मालिका संपल्यावर भारतीय संघ आयर्लंडला रवाना होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालक व माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याबरोबर एनसीएतील प्रशिक्षक सितांशू कोटक, साईराज बहुतुले आणि मुनीश बाली हे देखील रवाना होणार आहेत.
भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यात 26 व 28 जून रोजी दोन टी-20 सामने खेळणार आहे. याच मालिकेच्या वेळापत्रकात भारताचा प्रमुख संघ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफसह इंग्लंडला रवाना होणार आहे. तेथे गेल्या वर्षी स्थगित करण्यात आलेली एकमेव कसोटी भारतीय संघ खेळणार असून तीन एकदिवसीय तसेच तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या दोन्ही मालिका एकाच कालावधित होत असल्याने मुख्य संघासाठी द्रविड तर आयर्लंडविरुद्धच्या भारताच्या अन्य संघासाठी लक्ष्मण यांची नियुक्ती केली गेली आहे.
आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसून येत्या दोन दिवसांत संघ जाहीर केला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. गेल्या वर्षी ही मालिका खेळवली जात होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका वाढल्याने पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना स्थगित करण्यात आला होता. आता हा सामना 1 जुलैपासून खेळवला जाणार आहे.
जर हा कसोटी सामना भारताने जिंकला तर 2007 सालानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल. या सामन्यापूर्वी भारताचा कसोटी संघ 24 ते 27 जून या दरम्यान लिसेस्टरशायर संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्याचवेळी भारतीय टी-20 संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळेल. त्यानंतर 7 जुलैपासून एकदिवसीय व त्यानंतर टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.