बेंगळुरू – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत बलाढ्य मुंबईचा पहिला डाव 393 धावांवर संपला. हार्दिक तामोरेने दमदार शतकी खेळी करत शतकवीर यशस्वी जयस्वालप्रमाणेच वर्चस्व राखले.
बुधवारी दुसरा दिवस सुरू झाल्यावर मुंबई मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. तामोरेला शम्स मुलाणीने योग्य साथ दिली. त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. तामोरेने 115 धावांच्या खेळीत तब्बल 233 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 1 षटकार फटकावला. मुलाणीने आपल्या 50 धावांच्या खेळीत 130 चेंडू खेळत 5 चौकार फटकावले.
या जोडीने मुंबईच्या डावाला बळकटी दिली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर मुंबईचा डाव कोसळला. दिवसातील उर्वरित खेळात उत्तर प्रदेशच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. धवल कुलकर्णी व तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे समर्थ सिंग व प्रियम गर्ग यांना बाद करत मुंबईला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले.
रणजी स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 41 वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबईने या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून यंदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करत 42 वे विजेतेपद साकार करण्यासाठी त्यांचा संघ सज्ज होत आहे.