नेवासा – तालुक्यातील देवगाव, जेऊर व देवसडे या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संथ गतीने काम सुरू आहे. मात्र पुलाचे काम सुरू असल्याने शेजारून ठेकेदाराने कच्चा रस्ता तयार केला. मात्र पावसाने हा कच्चा रस्ता वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील ग्रामस्थांच्या दृष्टीने दळणवळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे.
या रस्त्याचे काम सध्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. नवीन पुलाचे काम करण्यासाठी ठेकेदाराने शेजारून कच्चा रस्तात तयार केला. मात्र शनिवारी (दि. 31) झालेल्या पाहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे जेऊर व देवसडेसह परिसरातील गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
देवसडेचे सरपंच अरविंद घोडेचोर यांनी ठेकेदाराकडे नवीन पुलावर मुरमाचा भराव टाकून मोटरसायकल व पायी जाण्या-येण्यासाठी तो सुरू करावा, अशी मागणी केली. मात्र ठेकेदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेवासे-शेवगाव तालुक्याच्या दळणवळण व ग्रामस्थांच्या वाहतुकीसाठी व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन हा पूल वाहतुकी योग्य करावा, अशी मागणी नागरिकांची जोर धरू लागली आहे.