मुंबई : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचारामुळे राजकारण चांगलच तापले आहे. राज्यभरात लाठीचार्जमुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच जालन्यातील आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दुसऱ्यांदा भेट घेतली. मात्र दोघांमधील चर्चा निष्फळ ठरली. राज्यभरातील नेत्यांनी जरांगे यांना पाठिंबा आणि राज्यभरात पाळले जाणारे बंद यामुळे सरकार कोंडीत अडकले आहे. याच गोष्टीवर उपाय करण्यासाठी रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठक, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आरक्षणावर तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.
आजही राज्यभरात आजही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत कोणता ठोस निर्णय घेण्यात आला का याकडेही राज्याच लक्ष लागलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘साम टिव्ही’ने दिले आहे.