पुणे – नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच, “बालगंधर्व’ हे नाव उच्चारताच मराठी मन अभिमानाने, आदराने भरून जाते. त्यांना न पाहिलेल्या, न एकलेल्या माणसांनाही बालगंधर्व म्हणजे एक स्वर्गीय कल्पना, विस्मयानंद देणारी दैवी आकृती वाटावी, यातच त्यांचे सारे कर्तृत्व सामावले आहे. बालगंधर्व हे विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.
अश्याच या नाट्य संगीत क्षेत्रातील महान कलाकाराच्या जीवनावर आधारित “बालगंधर्व’ या चित्रपटातने रुपेरी पडद्यावर सुद्धा मराठी सिनेरसिकांची मने जिंकली. २०११ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेता ‘सुबोध भावे’ यांनी चित्रपटात नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच, “बालगंधर्व’ यांची भूमिका साकारली होती.
https://www.facebook.com/subodhbhaveofficial/posts/3459984960690888
दरम्यान, या चित्रपटासाठी सुबोध भावे यांना भारतरत्न गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांच्या कौतुकाची थाप मिळाली आहे. झालं असं कि, नुकतंच गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांनी बालगंधर्व हा चित्रपट पाहिला. आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या त्या काळातील बालगंधर्व यांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर सुबोध भावे यांनी कृतज्ञता व्यक्त करत दीदींचे आभार मानले आहे. “साक्षात सारस्वतीदेवी कडून कौतुक, आयुष्याच सार्थक झालं” असं सुबोध म्हणाला आहे.
https://www.facebook.com/LataMangeshkar/posts/2954544681443095
दीदी आपल्या फेसबुक पोस्ट म्हणाल्या कि, “आज मी पहिल्यांदा बालगंधर्व हा मराठी चित्रपट पाहिला. नाट्य संगीत क्षेत्रातील महान कलाकार बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. बालगंधर्व यांना प्रत्यक्ष भेटण्याचा दोन -तीन वेळा योग आला होता. माझ्याशी खुप प्रेमाने भेटायचे. मला आशिर्वाद द्यायचे. हा चित्रपट पाहताना ते सर्व दिवस आठवले. त्यांच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या त्यादेखील माहित झाल्या. हा चित्रपट उत्तम बनला आहे. बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे अभिनेता सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणाले गायक आनंद भाटे तसेच इतर कलाकारांचे अभिनंदन. असे नमूद करत लतादीदींनी हा दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लतादीदींसोबत बालगंधर्व, वसंत देसाई, बेगम अख्तर आणि अंजलीबाई मालपेकर आदी दिग्गज मंडळी दिसत आहेत.