कोल्हापूर – कोल्हापूर आणि लता मंगेशकर यांचा संबंध तसा 1943 पासूनचा. वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानतंर मंगेशकर कुटुंबांच्या त्या पालनकर्त्या बनल्या. अगदी सुरुवातीला त्या खरी कॉर्नर परिसरात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या घराशेजारी भाडयाने राहत. साधारणपणे पंधरा रुपये भाडे होते. घरखर्च मोठा. कालांतराने त्यांनी घर बदलले. दैवेज्ञ बोर्डिंग समोरील डॉ. हासूरकर यांच्या दवाखान्यासमोरील कारेकर यांच्या घरी भाडयाने राहायच्या. त्या वरच्या मजल्यावर होत्या.
1952 मध्ये त्या चित्रपतस्वी भालजी पेंढारकर तथा बाबा यांच्या सहवासात आल्या. 1963 मध्ये भालजी पेंढारकर यांनी मोहित्यांची मंजुळा सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमातील गाणी लता मंगेशकर यांनी “आनंदघन’या नावांनी संगीतबद्ध केली. ही गाणी तुफान गाजली. भालजींच्या “मराठा तितुका मेळवावा, तांबडी माती, साधी माणसं’या सिनेमासाठी संगीत दिले. कोल्हापुरात मंगेशकर कुटुंबीयांचा कलामहर्षी बाबूराव पेंटर कटुंबींय, माधव शिंदे, तात्या अंबपकर, भाउसाहेब खांडेकर, आप्पासाहेब जाधव, लोहिया कुटुंबीय, डॉ. वझे कुटुंबीयांशी जिव्हाळयाचे संबंध होते.
“1978 मध्ये कोल्हापुरात “लता मंगेशकर रजनी’हा कार्यक्रम झाला होता. यावेळी जमलेल्या निधीतून स्टेडिअमच्या उभारणीसाठी पाच लाख रुपयांची रक्कम दिली. लता मंगेशकर यांच्या गायनकलेला 1968 मध्ये पंचवीस वर्षे झाली. यानिमित्त ख्यातनाम लेखक वि.स.खांडेकर यांच्या हस्ते मंगेशकर यांचा सत्कार झाला होता.
साधारणपणे 2000 मध्ये त्यांना कोल्हापूर महापालिकेने “कोल्हापूर भूषण’पुरस्कारांनी सन्मानित केले. दरम्यान 2005 नंतर मंगेशकर यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांचे कोल्हापुरात येणे कमी झाले.
कोल्हापुरात नागाळा पार्क येथे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आहे. 2005 मध्ये हे केंद्र पाहण्यासाठी मंगेशकर आल्या होत्या. यावेळी मंगेशकर यांनी तांबडी माती या सिनेमातील “माझ्या कपाळीच कुंकू’या गाण्याचे कागद केंद्राच्या हवाली केले.