कोपरगाव, (प्रतिनिधी): जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी मामा-भाची जात असताना कुख्यात गुंड लाला भोसले याने मामा नरेंद्र भोसले याच्या पोटात चाकूने वार करून खून केला होता. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी लाला भोसले याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दि. १७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र राजेंद्र भोसले व त्याची भाची स्नेहल विलास चव्हाण हे घराकडे जात असताना कुख्यात गुंड लाला राजन भोसले याने मागील कारणावरून नरेंद्र यास शिवीगाळ करून, तुला आता संपवतोच असे म्हणून त्याचे पोटात चाकूने वार केले होते.
यामध्ये नरेंद्र गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, नरेंद्रची भाची स्नेहल ही मामाला वाचविण्यासाठीमध्ये पडली असता तिच्या हाताला देखील चाकूचा वार लागला. यामध्ये तिच्या हाताच्या नसा कापल्यामुळे दोघेही रक्तभंबाळ झाले होते. फिर्यादी कुणाल राजेंद्र भोसले हा तेथे ४० फुटावर उभा होता, भांडणाचा आवाज आला म्हणून घटनास्थळी गेला असता आरोपी लाला भोसले हा आरोपी ललित कुंजीर याचे मोटार सायकलवर बसून फरार झाले.
फिर्यादी कुणाल भोसले याने ताबडतोब जखमींना प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी दाखल केले. दोघांवरती औषधोपचार चालू असताना नरेंद्र राजेंद्र भोसले याचे निधन झाले. कुणाल भोसले याचे फिर्यादीवरून आरोपी लाला भोसले व ललित कुंजीर यांचे विरुध्द लोणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांचे समोर चालू होता. यामध्ये सरकार पक्षाने १४ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी कुणाल भोसले, स्नेहलसह इतर साक्षीदार, पंच, वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू त्याच्या घराजवळील पाण्याच्या टाकीत टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
घटना बघणारे साक्षीदाराचे जवाब, फिर्यादीचा जवाब, पंच यांची साक्ष, दोन वैदयकीय अधिकाऱ्यांची साक्ष व परीस्थितीजन्य पुरावा हे बघून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी लाला रंजन भोसले यास जन्मठेपेची शिक्षा व १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील अशोक यहाडणे यांनी काम पहिले, लिपीक श्रीनिवास जोशी, पैरवी अधिकारी एन.एस. माळी सहायक फौजदार लोणी पोलिस स्टेशन यांनी कामकाजात सहकार्य केले.
२०२३ मध्ये ऐन दिवाळीत याच न्यायालयाने ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. आता पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने त्याला उजाळा मिळाला आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.