– हेमंत देसाई
भाजपाचे नेते आणि अभिनेते सनी देओल यांनी यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत भाष्य…
गेली 40 वर्षे चित्रपट क्षेत्रात असलेले अभिनेत्री सनी देओल हे 1983 सालच्या आपल्या “बेताब’ या पहिल्या चित्रपटामुळे चर्चेत आले. तो चित्रपट तुफान चालला आणि त्यानंतर सनी यांना धिम्या गतीने यश मिळत गेले. त्यांचे अर्जुन, डर, यतीम, घायल, घातक असे अनेक चित्रपट चालले. 2001 मध्ये आलेल्या त्यांच्या “गदर’ या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर नवे उच्चांक प्रस्थापित झाले आणि आताही वयाच्या 65व्या वर्षी “गदर 2′ या चित्रपटाने तुफान धंदा केला आहे. वयाच्या 65व्या वर्षी एवढे यश मिळवणे हे सोपे नाही. सनी यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली असून, प्रसिद्धीच्या झोतात राहणे हा त्यांचा स्वभाव नाही. मात्र अलीकडेच ते एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले.
त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव पुकारण्याची वेळ आली होती. बॅंक ऑफ बडोदाने 56 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे हा लिलाव रद्द करण्यात आल्याचे वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून बॅंकेने स्पष्ट केले. सनी यांनी थकित रक्कम भरणार असल्याचे सांगितल्यामुळे लिलाव रद्द केल्याचेही बॅंकेकडून कथन करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावर याबाबत टीका केली. परंतु ऋणको जर कर्जाची थकबाकी भरणार असेल, तर त्याला तशी संधी दिली जाते, असे स्पष्टीकरणही देण्यात आले. आमच्याकडे फोन बॅंकिंग चालत नाही. म्हणजेच नवी दिल्लीतून फोन करून राष्ट्रीयीकृत बॅंकांना कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाचे कर्ज माफ करायचे, हे सांगितले जात नाही, असा विद्यमान राज्यकर्त्यांचा दावा आहे. सनी यांच्या प्रकरणामुळे त्याला छेद दिला जातो आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
शिवाय सनी हे भाजपचे गुरूदासपूर येथील खासदारही असून, त्यांना झुकते माप दिले गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. सर्वसामान्य माणूस अथवा शेतकरी यांचा एखादा हप्ता थकला, तर मात्र लगेच नोटीस कशी दिली जाते, असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले. धनको दारात येणे, जप्तीची वा लिलावाची नोटीस येणे, यामुळे सर्वसामान्य माणसाचाही अपमान होत असतो. तो जाणीवपूर्वक हप्ते थकवत नाही. परंतु काही संकटे येतात, त्यामुळे तो अडचणीत येतो. अशावेळी सेलिब्रिटीला ज्या सवलती मिळतात, त्या त्याला मिळत नाहीत. कारण सरकारमध्ये व बॅंकेत त्याचे कोणीही परिचयाचे असे नसते. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, हे चित्र खरेच योग्य नाही.
देशभक्तीसाठी जान कुर्बान करणारा, गरिबांसाठी लढणारा नायक, अशी सनी यांची चित्रपटातील प्रतिमा आहे. या प्रतिमेस गेल्या काही दिवसांत तडा गेला आहे, हे नक्की. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत मी भाग घेणार नाही, म्हणजेच मी निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या थकित कर्जाविषयी पत्रकारांच्या प्रश्नास कोणतेही उत्तर न देणाऱ्या सनी यांनी, एकाचवेळी अभिनय करणे आणि राजकारणात भाग घेणे, हे आपल्याला शक्य होणार नाही, असे म्हटले आहे. वास्तविक हा विचार निवडणुकीचे तिकीट घेण्यापूर्वीच त्यांनी करायला हवा होता. परंतु 2019 मध्ये सनी यांना फारसे चित्रपट मिळत नव्हते अथवा त्यांचे एकापाठोपाठ एक सिनेमे कोसळत होते. त्यांनी आपल्या मुलालाही नायक म्हणून सिनेमात आणले.
परंतु तो चित्रपटही दणक्यात आपटला. अशावेळी भाजपने एकदम लोकसभा तिकीट दिल्यामुळे त्यांनी ते स्वीकारले असावे. सनी यांची पडद्यावरील प्रतिमा आक्रमक राष्ट्रवादी नायकाची आहे. ती भाजपच्या राजकारणाशी सुसंगत असल्यामुळे सनी यांना लोकसभेत संधी देण्यात आली. 2019 मध्येही मोदी यांची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे, त्या बळावरच सनी यांनी विजय मिळवला. यापूर्वी सनी यांचे वडील धर्मेंद्र हेही खासदार झाले होते. परंतु त्यांनी मतदारसंघासाठी काहीही केले नाही. सध्या खासदार असलेल्या धर्मेंद्र यांच्या पत्नी व अभिनेत्री खुद्द हेमा मालिनी यांनीही गमतीगमतीत ही गोष्ट मान्य केली होती. कॉंग्रेसने राजेश खन्ना यांना संसदेत संधी दिली होती. राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव 1984 साली राजेश यांनी कॉंग्रेसचा प्रचार केला होता. 1991 साली नवी दिल्लीतून लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा केवळ 1589 मतांनी पराभव केला होता. 1992 साली अडवाणी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या राजेश खन्ना यांनी भाजपच्या शत्रुघ्न सिन्हा यांचा 25 हजार मतांनी पराभव केला.
खासदारकीची टर्म संपल्यावरही राजेश यांनी अनेक वर्षे निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा प्रचार केला. याला विचारांची असलेली एकनिष्ठा, असे म्हणतात. विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे भाजपतर्फे लोकसभेत निवडून आले आणि मंत्रीदेखील झाले. शत्रुघ्न हे तर अडवाणींच्या निकटवर्तुळातील होते. सनी यांनी मात्र संसदेत 19 टक्के इतकीच उपस्थिती लावली. संसदेतील अनेक खासदारांची वागणूक पाहिली की वाटते, आपण तिथे मिसफिट आहोत, अशी भावना सनी यांनी व्यक्त केली आहे. संसदेत बसणारे बहुतेकजण तिरस्करणीय असून, स्वतः मात्र धुतल्या तांदळसारखे आहोत, हा सनी यांचा केवळ अहंभावच आहे. मतदारांसाठी सनी यांनी ठोस असे काहीही केलेले नाही. अशावेळी यापुढे त्यांना भाजपने तिकीट दिलेच असते, असेही नाही. परंतु उशिरा का होईना, सनी यांनी हा शहाणपणाचा निर्णय घेतला आहे, असे दिसते.