राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या काही विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याबाबतची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि खासदारांनी मूळ पक्षापासून फारकत घेऊन महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्याचे वर्णन “फूट’ असे करायचे की नाही याबाबत संभ्रम तयार होत आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे; पण त्याला “फूट’ म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. याच प्रकारची भूमिका खासदार सुप्रिया सुळेसुद्धा सातत्याने मांडत आहेत. या सर्व गोष्टी सांगत असतानाच शरद पवारच आमचे राष्ट्रीय नेते असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे विधानही ठासून सांगितले जात आहे. पण व्यवहारीपणे वास्तवाचा विचार करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक आमदार आणि खासदार मूळ पक्ष सोडून भाजपाच्या वळचणीला गेले आहेत, ही मान्य करण्यासारखीच गोष्ट आहे. शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या विधानानंतर आणि काही तासांतच ती विधाने मागे घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पण आता शरद पवार यांनी यानिमित्ताने विधिमंडळ पक्ष वेगळा आणि पक्ष संघटना वेगळी हे नवीन सूत्र आता समोर ठेवले आहे. अर्थात, गेल्यावर्षी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या गटाने नवीन घरोबा केला होता, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलेला हा विषय असो किंवा निवडणूक आयोगासमोर गेलेला विषय असो या दोन्ही संस्थांनी विधिमंडळ पक्ष वेगळा आणि पक्ष संघटना वेगळी अशा प्रकारचे निर्णय दिले होते. पक्षाच्या अध्यक्षांनी काढलेले आदेशच महत्त्वाचे असतात. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची नियुक्ती पक्षाचा अध्यक्ष करत असतो. या सर्व नियमावरही सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. शरद पवार हे सध्याच्या या गोंधळाच्या वातावरणात त्याच प्रकारची भूमिका मांडत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी जे शक्ती प्रदर्शन केले ते पक्षीय संघटनेतील आपली ताकद दाखवण्यासाठीच केले, हेही लपून राहणार नाही.
शरद पवार यांनी बीड आणि कोल्हापूर शहरांमध्ये भव्य अशा सभा घेतल्या आणि आपली पक्षीय संघटनात्मक ताकद दाखवून दिली. दुसरीकडे, अजित पवार यांनी बारामती शहरात शक्ती प्रदर्शन केले. ज्याप्रकारे अजित पवार यांचे बारामतीमध्ये स्वागत करण्यात आले ते पाहता बारामतीमधील पक्ष संघटना आपल्याच पाठीशी आहे, हे दाखवण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला आहे. शरद पवार यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या आहेत त्या ठिकाणी “उत्तर सभा’ घेण्याचे नियोजनही अजित पवार गटाने केले आहे. अजित पवार यांच्या पाठीशी आमदार आणि खासदारांच्या बहुमताची ताकद असली तरीसुद्धा पक्षीय संघटनेवरसुद्धा आपले वर्चस्व दाखवून देण्याचे काम आता आगामी कालावधीमध्ये त्यांना करावे लागणार आहे. ज्या प्रकारे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सभा घेऊन त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीसुद्धा त्याच ठिकाणी राजकीय सभा घेऊन आपल्या मागे शिवसेनेचे संघटन किती मोठ्या प्रमाणावर उभं आहे हे दाखवण्याचाही प्रयत्न केला. त्याच प्रकारे आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार आपल्या मागील पक्ष संघटनेची ताकद दाखवण्याचे काम येत्या काही कालावधीमध्ये करतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
इतर सर्व राजकीय पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यामधील मूळ फरक हा आहे की शरद पवार यांनी निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी बांधून आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली जे नेते शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसमधील फुटीनंतर आले होते ते सर्व स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची खात्री बाळगणारे होते. या नेत्यांची स्वतःची अशी एक विशिष्ट वोट बॅंक आहे आणि विशिष्ट प्रदेशांमध्ये ते नेते खूप लोकप्रिय आहेत. येत्या कालावधीमध्ये अजित पवार आणि शरद पवार ज्या ठिकाणी सभा घेतील त्यांच्या सभांना जरी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तरी ती गर्दी या नेत्यांची लोकप्रियता खऱ्या अर्थाने सिद्ध करेल का, याबाबत शंका वाटते. एकनाथ शिंदे यांनी ज्या नियोजनबद्ध पद्धतीने शिवसेनेवर ताबा घेतला आणि शहर पातळीपासून तालुका पातळीपर्यंत विविध प्रकारच्या नियुक्ती नव्याने केल्या त्या प्रकारची कोणतीही प्रक्रिया सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू नाही.
अजित पवार यांच्या गटाने कोणत्याही नव्या नियुक्त्या केलेल्या नाहीत. शरद पवार हेच आमचे नेते असल्याचे आतापर्यंत अजित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी सांगत आले आहेत. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही कार्यक्रमांमध्ये “माझे छायाचित्र वापरू नये’, अशा सूचना जरी शरद पवारांनी दिल्या असल्या, तरी अद्यापही सर्वच कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांची छायाचित्रे वापरली जात आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असला तरी आणि नऊ आमदार मंत्री म्हणून कार्यरत असले तरी पक्ष संघटना आमच्या पाठीशी आहे, या एकाच मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, अशी भूमिका आता शरद पवार घेताना दिसत आहेत. या भूमिकेमुळे जरी गोंधळ आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विरोधी पक्षांच्या आघाडीलाही बसेल, असे दिसत आहे. कारण ज्या प्रकारे विरोधी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे किंवा शरद पवार यांनी अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी अशी मागणी केली आहे ते पाहता राज्यातील महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रीय पातळीवरील “इंडिया’ आघाडी असो या दोन्ही आघाड्यांमधील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची भूमिका काय असेल, याबाबतही गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आणि कॉंग्रेस पक्षानेसुद्धा स्वतंत्रपणे आपले पक्ष संघटन वाढवण्याचा आणि राज्याच्या विविध भागांमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. ते पाहता महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल, याबाबतही शंका निर्माण होऊ लागली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने न्यायालयीन पातळीवर किंवा निवडणूक आयोग पातळीवर काही हालचाली सुरू केल्या आणि आयोगाने काही निर्देश दिले तरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये या कथित फुटीबाबत काही स्पष्टता समोर येऊ शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील या घडामोडींचे वर्णन कोणी कसेही केले, तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट सरकारमध्ये सहभागी आहे, हे वास्तव आहे. अर्थात, व्यवहार्य वास्तव काही असले तरी विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना यांच्यातील हा तांत्रिक संघर्ष आगामी काळात चालू राहील, असेच संकेत मिळत आहेत.