सातारा -जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी. सध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना खते, बियाणे यांची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
कोरेगाव पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व वाटाणा बियाणे वाटपाच्या शुभारंभ करताना मंगेश धुमाळ बोलत होते. यावेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील, उपसभापती संजय साळुंखे, जयश्रीताई फाळके, मार्केट कमिटीचे संचालक गुलाबराव जगताप, बाळासाहेब फाळके, विलास चव्हाण, प्रदीप जगताप, गट विकास अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी भस्मे, कृषी अधिकारी बावधनकर, संजय बर्गे, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.
मंगेश धुमाळ म्हणाले, “करोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रात मंदीची लाट आहे. अशा बिकट परिस्थितीत अनेक उद्योगधंदे बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी खेड्यातून शहराकडे नोकरीनिमित्त गेलेला युवा वर्ग गावाकडे येण्याची शक्यता आहे. या युवकांनी खचून न जाता आपली शेती चांगल्या पध्दतीने करावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना लागेल ती मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन, वाटाणा बियाणे वाटण्यात येत आहेत.’ भीमराव पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमानंतर श्री. धुमाळ यांनी कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला बालकल्याण, आयसीडीएस आदी विभागांचा आढावा घेतला. पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु असलेली कामे दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.