दिल्ली: भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यास कुवेतचा पाठिंबा असणार नाही. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांना आपण बांधील आहोत, असे कुवेतने भारताला कळवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच ही माहिती दिली. भारतातील काही भागात मुस्लिमांवर हल्ले होत असल्याच्या संदर्भाने कुवेतमधील काही मानवाधिकारवादी कार्यकर्त्यांनी ट्विटरवरून टीका करायला सुरुवात केली होती. त्यासंदर्भात उपस्थित झालेल्या शंकांना परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कुवेतमधील काही अधिकृत नसलेल्या व्यक्तींकडून भारतविरोधात सोशल मीडियावर प्रचार केला जातो आहे. मात्र, कुवेत सरकार भारताबरोबरच्या मैत्रीच्या संबंधांना विशेष महत्त्व देत आहे आणि भारतातील अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना कुवेतचा पाठिंबा असणार नाही, अशी ग्वाही कुवेत सरकारच्या वतीने भारताला दिली गेली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. करोनाविरोधातील उपाययोजनांसाठी भारताकडून तातडीची मदतही कुवेतला पाठवली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुवेतचे भारतातील राजदूत जससेम अल-नजीम यांनीही दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये हस्तक्षेप न करण्याच्या तत्त्वावर चर्चा केली आहे.
ओमानच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंटवरून चिथावणी
“परदेशी प्रायोजित’ सोशल मीडिया हॅंडल्स व पोस्टस्द्वारे भारताबरोबरचे संबंध बिघडवण्याच्या प्रयत्नांना ओमान, सौदी अरेबिया आणि कतार यांनीही विरोध केला आहे. ओमानच्या राजघराण्याच्या नावे एक बनावट ट्विटर हॅन्डलवरून एक चिथावणीखोर ट्विट पोस्ट झाले होते. जर भारतातील मुस्लिमांवरील हल्ले थांबले नाहीत, तर ओमानमधील भारतीयांची हकालपट्टी केली जाईल, अशी धमकी त्या ट्विटद्वारे दिली गेली होती, पण हे ट्विटर अकाऊंट बनावट असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर ओमान, सौदी अरेबिया आणि कतारने भारतविरोधात सोशल मीडियावरच्या अपप्रचारांना विरोधाची भूमिका स्पष्ट केली होती.