श्रीगोंदा -आवर्तन सुरु असताना पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा आव आणण्याऐवजी आमदार बबनराव पाचपुते यांनी वितरिकांना पाणी वाटपाचे नियोजन करायला हवे होते, असे म्हणत “कुकडी’च्या पाण्याचे वाटोळे पाचपुतेंमुळेच झाल्याचा आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, गेली पाच वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना मीही विरोधी बाकांवरच होतो. शिवाय अपवाद वगळता तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती.परंतु, तत्कालीन पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांशी समन्वय राखून पाण्याचे नियोजन केले.
विरोधी पक्षाचा आमदार असल्याने पाणी वाटपात अन्याय होत असल्याचा कांगावा सध्या आ. पाचपुते करीत आहेत. बुधवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुणेकरांशी पंगा घेतल्याचे पाचपुतेंनी नाटक केले. आवर्तनाच्या काळात स्थानिक पातळीवरील वितरिकांना पाणी देण्याचे नियोजन करण्याच्यावेळी तोंडाला कुलूप लावले, आणि आता बैठकीत आरोळ्या ठोकून काय होणार? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.
जगताप यांनी पुढे म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सुरू झाल्यानंतर वितरिका क्र. 132 ला पाणी सुरू होणे गरजेचे होते, परंतु पाणी उशिरा सुरू झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. पाण्याचा गैरवापर झाल्याने एकही पाझर तलाव भरता आला नाही. त्याचबरोबर विसापूरचे आवर्तन सुरू होऊन महिना लोटला तरीही विसापूरमध्ये कुकडीचे पाणी सोडण्यात आलेले नाही. आता विसापूरचे पुढील आवर्तन कसे करणार ? असा सवाल उपस्थित करीत जगताप यांनी म्हटले आहे की, आवर्तन सुरू असताना सगळ्यांना पाणी देण्याकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे आता शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी पुणेकरांशी “खडाजंगी’ झाल्याचे पाचपुतेंकडून नाटक केले जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा असताना शेतकऱ्यांना पाणी देण्यात अपयश येत असेल तर ती जबाबदारी कोणाची असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. तसेच पाचपुतेंनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी सीवकारावी, असे ही राहुल जगताप यांनी म्हटले आहे.