किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीसह गोव्यालाही क्यार चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यामुळे मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वच परिसर जलमय झाला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने “क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत चाकरमान्यांना नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत गुरुवारी (24 ऑक्टोबर) पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे.
क्यार चक्रीवादळ धडकल्याने कोकण किनारपट्टीवर उचं लाटा उसळत आहेत. मालवणमध्ये पावसाने हाहा:कार उडवला असून सर्व रस्ते जलमय झाले आहेत. शनिवारी (26 ऑक्टोबर) सकाळपासून मालवणमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे काही घरांनाही पाण्याचा वेढा घातला आहे. वादळामुळे समुद्रही खवळला आहे. खवळलेल्या समुद्राचे पाणी ही वस्तीत शिरले आहे. त्यामुळे मालवणमधील लोक भितीच्या छायेखाली आहेत.
मालवण बाजारपेठेतील राञीपासून पडणारा पाऊस आणि समुद्राला असणारी भरती पाणी शिरले आहे. भंडारी हायस्कूल ते भाजी मार्केट अंबिका कॉम्प्युटर, हॉटेल सागर किनारा एवढ्या भागात एक फूट पाणी साचले आहे. यामुळे मच्छिमार व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस सुरु आहे. तर किनारपट्टी भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातही अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. क्यार चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.