कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला. या भागातील पूरही ओसरू लागला आहे त्यामुळे पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यात मदत होत आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे. कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत.
कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी ओसरत असल्याने हळूहळू जनजीवन पुर्ववत होण्यास मदत आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एकीकडे पुरामुळे एटीएम बंद असल्याने पैशांची टंचाईदेखील उद्भवली आहे. त्यात भाजीपाला आणि दुधाच्या भावदेखील वाढले आहेत. वांगी 200 रुपये किलो, पालेभाज्या 125 ते 160 रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी 100 रुपये भावाने विकली जात आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. कोल्हापूरात तूरडाळ 125 रुपये किलो, मसूर 100 रुपये, तर मटकी 160 रुपयांनी विकली जात आहे.