कोल्हापूर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या दिवसा १० तास वीज मागणीच्या प्रश्नाकडे महावितरणचे उच्चपदस्थ अधिकारी , उर्जामंत्री , आणि राज्य मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री यांना लक्ष द्यायला वेळ नसेल तर आता शेतकर्यांनी “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार रात्री शेतात पाणी पाजत असताना स्वत:च खबरदारी आणि दक्षता घ्यावी . शक्यतो साप बिबट्या , गवा , अस्वल , रानडुक्कर अशासारख्या जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
जंगली प्राण्यांची जोपासणा व संवर्धन करणे ही संपुर्ण जबाबदारी सरकारची आहे. यामुळे हे प्राणी जर चुकून आपल्या शेतात आले तर त्यांना त्यांच्या सरक्षणार्थ सरकारी कार्यालयात सोडणे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सर्व शेतकर्यांनी इमानदारींने पुर्ण करावे. रात्री शेतकर्यांनी रात्रीच वीज घ्यावी असा अट्टाहास करणा-या राज्य सरकारने आपली महानिर्मितीच्या मालकीची असलेली प्रतियुनिट १ रूपया उत्पादन खर्चाची जलविद्युत केंद्रे बंद का ठेवलेली आहेत या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
राज्यामध्ये दररोज जवळपास २३ हजार मेगावॅट वीजेचा खप आहे. पैकी महानिर्मिती ५५०० मेगावॅट एवढी वीजनिर्मीती करते ,एन. टी. पी. सी. कडून ४५०० मेगावॅट वीज खरेदी होते. अद्यापही ४५०० मेगावॅट महानिर्मीतीची क्षमता असणारे प्रकल्प बंद ठेवून खासगी क्षेत्रातून १३ हजार मेगावॅट एवढी वीज खरेदी केली जाते. यापैकी दिनांक २२ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या काळामध्ये कावास या कंपनीकडून २१ रूपये १९ पैसे या दराने वीज खरेदी केलेली आहे. गंधार २०.९८ पैसे टाटा पॅावर २१.१५ पैसे इतक्या चढ्या दराने खरेदी केलेली आहे. या खरेदीपाठीमागचा सुत्रधार कोण या प्रश्नाचे उत्तर राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील जनतेला द्यावे लागेल.
महावितरणचे वेगवेगळ्या ग्राहकांना असणारे वीजेचे दरपत्रक इतर राज्यातील दरपत्रकाशी तुलना केली असता कर्नाटक , गोवा , आंध्रप्रदेश , गुजरात , राजस्थान , मध्यप्रदेश या राज्यातील सर्व प्रकारच्या वीज दरापेक्षा महाराष्ट्राचे वीजदर अधिक का आहे हे वरील उदाहरणावरून लक्षात येईल. राजस्थान सरकार शेतकर्यांना दिवसा वीज देण्याची घोषणा करते आम्ही त्याचे अभिनंदनच करतो आणि आपले राज्य सरकार दुस-या बाजूला शेतकर्यांनी रात्री वीज घ्यावी यासाठी जबरदस्ती करते म्हणूनच महाराष्ट्र सरकारचे लाडके जंगली प्राणी सरकारी कार्यालयात इतमामाने सोडल्याशिवाय शेतकर्यांना न्याय मिळेल असे वाटत नाही.
आज बेमुदत धरणे आंदोलनाच्या तिस-या दिवशी शेतक-यांना चिंचवाड व वळीवडे गावातून ७०० भाकरी तसेच सुधीर चौगुले यांनी २५ किलो तांदूळ , गडहिंग्लज येथील शेतकरी अशोक पाटील यांनी २२०० रूपये व कमाल मुल्ला या शेतकर्यांने २५ डझन केळी दिले. आज दिवसभरात आमदार विनय कोरे , जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन आबिटकर , विजयसिंह माने , रणजित कदम , आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई , जि. प. सदस्य प्रसाद खोबरे , यांचेसह विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी आंदोलनास भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.