मुंबई – गोलंदाजीत उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर फलंदाजीत अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा 6 गडी राखून सहज पराभव केला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे.
अंद्रे रसेलने 31 चेंडूत वादळी 70 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रसेलने 2 चौकार आणि 8 षटकार लगावले. आंद्रे रसेलने 12 वे षटक टाकणाऱ्या ओडिन स्मिथची गोलंदाजी फोडून काढली. स्मिथच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार लगावत एकूण 29 धावा वसूल केल्या. रसेलला सॅम बिलिंग्सने चांगली साथ दिली. बिलिंग्सने नाबाद 24 धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.
पंजाबकडून राहुल चहरने चार षटकात 13 धावा देत 2 गडी बाद केले. त्याशिवाय कगिसो रबाडा आणि ओडियन स्मिथ यांना प्रत्येकी एक एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव व टीम साऊदी यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतरही भानुका राजपक्षे व कागिसो रबाडा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने 18.2 षटकांत सर्वबाद 137 धावा केल्या. निम्मा संघ 84 धावांत तंबूत परतल्यावरही राजपक्षे व रबाडाने उपयुक्त खेली करत समाधानकारक धावसंख्या उभारली.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय अचुक ठरवताना यादवसह टीम साउदीनेही अफलातून स्पेल टाकला. पंजाबचा कर्णधार मयंक आग्रवाल पुन्हा एकदा वेगवान सुरुवात देण्यात कमी पडला. उमेशने त्याला पायचीत केले. या धक्क्यातून पंजाबचा संघ सावरलाच नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले व एकवेळ 5 बाद 84 अशी बिकट स्थिती बनली.
यावेळी श्रीलंकेचा स्टार फलंदाज भानुका राजपक्षे दावून आला व त्याने काही अविश्वसनीय फटकेबाजी करत 9 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावताना 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर पुन्हा एकदा उमेश यादवने साउदी, शिवम मावी व आंद्रे रसेलसह पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झाल्यावर या स्पर्धेपूर्वीचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या कागिसो रबाडाने काही धाडसी फटके मारले व 16 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 25 धावांची अमुल्य खेळी केली. त्यामुळेच पंजाबला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कोलकाताकडून उमेश यादवने 4 तर, टीम साउदीने 2 गडी बाद केले. आंद्रे रसेल, शिवम मावी व सुनील नरेन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.