नोएडा – उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात प्रशासनाने लादलेला जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसवत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत किसान पंचायत भरवण्यात आली. या पंचायतीत नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
शामली जिल्ह्यातील भैन्सवाल येथे येथे जिल्ह्यातून आणि आजू बाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर, मोटारी, दुचाकीवरून दाखल झाले. राष्ट्रीय लोक दलने या किसान पंचायतीचे आयोजन केले होते. उत्तर प्रदेशमध्ये यापुर्वी मुझफ्फरनगर, मथुरा आणि बागपत येथे यापुर्वी किसान पंचायत आयोजित केल्या आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या पंचायतीला खापचे विभागीय नेते, भारतीय कसान युनियनचे सदस्य आणि राष्ट्रीय लोक दलाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी उपस्थित होते.
राज्य सरकारने ही पंचायत होऊ नये यासाठी जमावबंदी आदेश लागू केले होते. त्यानंतर चौधरी यांनी ट्विट केले. शामलीला उद्या जाण्यासाठी माझ्याकडे 144 कारणे आहेत. असे त्यात म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय लोक दलाने यापुर्वीच पाठींबा दिला आहे.