- खर्च झाला परवडेनासा : खर्चापेक्षा उत्पन्न कमी, शेती खर्चासह मजुरी अधिक
खालापूर : खालापूर तालुक्यात यावर्षी सततधार पावसाने सर्वांना झोडपून काढले खरे. मात्र या मुसळधार पावसाचा सामना करीत तालुक्यात सर्वच शेतकरी वर्गाने आपली परंपरागत शेती व्यवसाय केला. त्यामुळे बहुतांशी भातशेतीची कामे पूर्णत्वात आली असून, मात्र गेल्या काही दिवसांपासूनच्या लहरी हवामान त्यातच मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या आणि मेहनतीच्या मानाने परंपरागत शेती व्यवसाय परवडेनाशी झाली असून, उत्पनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेती आता परवडेनाशी झाली असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी राजाला शेती व्यवसाय करण्यासाठी शासनाने विविध योजनाचा लाभ करून द्यावा, अशी मागणी सध्या काही जाणकार शेती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील निवडक ठिकाणची भातशेतीची कामे पूर्ण झाली असून, शेतमजुराची मजुरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली असल्याने उत्पनापेक्षा खर्च अधिक होत आहे. एखादे भातपीक पिकवण्याकरिता दर 1 खंडी (10 पोती) पिकासाठी शेतकऱ्याला 11 ते 12 हजारांचा आसपास खर्च येत असतो. तर भात पेरणीपासून भात लागवडीपर्यंत शेतकऱ्यांना जमीन नांगरणीकरीता एक नांगराला दिवसाला 600 ते 700 रुपये द्यावे लागत असून, टॅक्ट्रर चालक ही 1 तासाला 450 ते 600 रुपये खर्च घेता असतो. शेतमजुराच्या मजुरीचे दर दिवसाला पुरुषाला 300 रुपये, तर महिला मजुरास 270 रुपये द्यावे लागते. तसेच शिवाय मजुरांना सकाळी चहा-न्याहारी, दुपारचे जेवण व वाटखर्च द्यावा लागतो. बेनणी काढणे, खते-औषधे फवारणी करण्याकरिता अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भातपिकांच्या उत्पादनाकरिता जेवढा खर्च होतो, तेवढ्या खर्चाचे पीक सुध्दा येत नाही.
पाऊस शेतीपूरक पडला, तर ठिक अन्यथा शेतकऱ्याला तोट्यात जावे लागते. त्यामुळे शेती व्यवसाय करायला कोणी धाडस करीत नाहीत. एखाद्या जमीन मालकाची शेती दुसऱ्या एखाद्याने कसायला घेतली, तर पूर्वी येणाऱ्या पिकाचे दोन समान भाग केले जायचे त्यास ग्रामीण भागात अरदल असे म्हणतात. पण आता चार वाट्यांपैकी तीन वाटा शेती कसणारा घेतो तर फक्त एक वाटा मालकाला मिळतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महागाईमुळे काही शेतमालकाची शेती ओसाड पडली आहे. तर जमिनीची चांगली मशागत करून चांगले पीक आले नसल्याने केलेल्या मेहनतीचे चीज मिळाले नाही म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहेत.
शेत मजुरांची मजुरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने भातशेती करणे कठीण बनले आहेत. दुसरीकडे खर्चाच्या तुलनेने उत्पन्न व बाजारभाव मिळत नसल्याने भातशेती करणे एक निव्वळ दिसावा उरला असून, शेती व्यवसाय वडिलोपार्जित असल्याने करावा लागतो.
– प्रसाद पाटील, शेतकरी, महड.