औरंगाबाद – चंद्रकांत खैरे माझ्यावर आरोप करतात, पण खैरे हे दिल्लीत कधीच रमले नाहीत, ते औरंगाबाद महापालिकेतच गटार साफ करण्यासारखी छोटी छोटी कामे करत राहिले, चंद्रकांत खैरे 50 किलोमीटर वरून साधे पाणी आणू शकले नाहीत, पण मी मात्र श्रीगोंदा इथून औरंगाबादसाठी गॅस पाईपलाईन आणली आहे. ती 130 किलोमीटर शहरात फिरवणार आहोत असा पलटवार केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातले राजकारण पुन्हा तापले आहे.
पिटलाईन औरंगाबाद शहरात यावी यासाठी मी प्रयत्न केले, पण दानवेसाहेब रेल्वे मंत्री झाले आणि पिट लाईन जालन्याला गेली. पण ते औरंगाबादला पिटलाईनसाठी नाही म्हणाले नाहीत, त्यामुळे औरंगाबादसाठी सुद्धा दुसरी पिटलाईन होऊ शकते, असेही कराड म्हणाले आहेत.
औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे चालू करावी यासाठी मी मागणी करणार आहे. मेट्रो कधी येईल हे माहिती नाही मात्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना अद्याप दिल्ली कळलेलीच नाही, दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केले आहे.
भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कुण्याही बॅंकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातले आहे, ते काहीही करू शकत नाहीत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी डॉ. भागवत कराड यांच्यावर केली होती, त्यानंतर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खैरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.