शहरातील दुकाने सर्रास सुरू : करोनाची गांभीर्यता कळली नाहीच
शिरूर – आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार व महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी पुणे यांनी काढलेला जमावबंदीचा आदेश आणि दुकानेबंदीच्या आदेशाला शिरूरच्या तहसील खात्याने, पोलीस खात्याने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे शिरूर शहरात करोना व्हायरसबद्दल प्रशासनामध्ये गंभीरता नाही, तर नागरिकांमध्येही गंभीरता येणार कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिरूर नगरपालिकेने रिक्षा फिरवून दुकाने बंद करण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले होते. मात्र, तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन हात झटकून बसले आहे. कोणतीही उपाय योजना करताना दिसून येत नाही. शिरूर तालुक्यात यात याबाबत शिक्रापूर रांजणगाव कारेगाव गंभीर झाली आहे, परंतु तालुक्यातील सर्वात मोठे शहर शिरूर येथील पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
शिरूर नगरपालिका प्रशासनाने थोडीफार गंभीरता घेतली असून बुधवारी (दि. 18) त्यांनी तालुका वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील व तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांची बैठक बोलविली होती. यात रोगाबाबत चर्चा झाली. परंतु महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हा अधिकारी यांनी करोना व्हायरस आजाराचे गंभीर ओळखून शहरातील दुकाने कोणकोणती बंद असावी याबाबत उल्लेख केला आहे.
मोठ्या मॉलपासून तर साध्या विक्रेत्यांनापर्यंत बंद असा आदेश दिले असताना मात्र, शिरूर पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांनी याबाबतची कुठलीही खबरदारी घेतली नाही. सकाळपासूनच शिरूर शहरातील हॉटेल्स, छोटे व्यावसायिक, मोठे व्यावसायिक यांनी आपले व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू ठेवले होते. यावरून पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनही याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर तालुक्यात सर्वांत मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून या पंचतारांकित वसाहती हजारो कामगार काम करीत आहेत. करोनामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण कंपनी व्यवस्थापन व इतर शासकीय कार्यालय या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नाही. त्यामुळे या वसाहतीत काम करणारे कामगार हवालदिल झाले आहेत. आम्हालाही जगायचे असे म्हणत आम्हालाही सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी कामगार करीत आहेत.