नवी दिल्ली – दिल्ली निवडणुकीतील मोठ्या यशानंतर दिलेल्या पहिल्याच प्रतिक्रीयेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारत माता की जयचा जयघोष करीत दिल्लीकरांचे आभार मानले. आपल्या निवासस्थानी जमलेल्या समर्थकांपुढे बोलताना दिलवालो आय लव्ह यु असे म्हणत त्यांना अभिवादन केले.
ते म्हणाले की हा माझा विजय नाहीं. संपुर्ण दिल्लीचा हा विजय आहे. ज्या कुटुंबांनी मला त्यांचा मुलगा मानले त्या कुटुंबांचा हा विजय आहे. आता यापुढे देशात कामाचे राजकारण चालणार, अन्य राजकारण चालणार नाही असा नवा राजकीय ट्रेंड दिल्लीकरांनी प्रस्थापित केला आहे. यावेळी केजरीवालांना हनुमानाचाही आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की आज मंगळवार आहे हा हनुमानजींचा दिवस आहे. त्या हनुमानाचेही मी आभार मानतो. त्यांच्या आशिर्वादामुळेच आपण हा विजय मिळवू शकलो आहोत. निवडणूक प्रचाराच्यावेळी केजरीवालांनी हनुमान चालीसाचे पठण केले होते. त्यावरूनही भाजपने त्यांची खिल्ली उडवली होती, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या विजयी सभेत हनुमानजींचेही विशेष आभार मानले.
केजरीवालांसाठी आजचा दिवस हा डबल सेलिब्रेशनचा दिवस होता, कारण त्यांच्या पत्नी सुनिता यांचाही आज वाढदिवस होता. तो उल्लेखही त्यांनी या पहिल्या भाषणात केला. आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना भारत माताकी जयचा जयघोष केला. ही घोषणा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सहसा ऐकू येत नाही. त्यांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडून आपला आनंद व्यक्त केला.