नवी दिल्ली – संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली आहे. आम आदमी पक्षाने 70 पैकी तब्बल 63 जागा जिंकून जवळपास गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती केली आहे. गेल्या वेळी या पक्षाला 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा असलेल्या व सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला केवळ 7 जागा मिळाल्या.त्यांच्या जागा 4 ने वाढल्या आहेत. कॉंग्रेसला गेल्यावेळे प्रमाणेच याही वेळी खाते उघडण्यातही अपयश आले आहे. त्यांना एकही जागा मिळू शकली नाही.
भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी पक्षाचे 240 खासदार दिल्लीच्या प्रचारात उतरवले होते. तसेच केंद्रातील असंख्य मंत्री, अनेक आजीमाजी मुख्यमंत्री असा मोठा फोैज फाटा भाजपने प्रचारात उतरवला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे तर अखेरच्या टप्प्यात घरोघरी प्रचार पत्रके वाटताना दिसले होते. इतके सारे प्रयत्न करूनही भाजपच्या पदरात दारूण अपयश आले आहे. विकास कामे विरूद्ध भावनिक मुद्दे अशी ही निवडणूक झाली त्यात लोकांनी केजरीवालांच्या विकास कामांच्या बाजूने कौल दिला अशी सार्वत्रिक प्रतिक्रीया आहे.
ओखला मधून अमानुतुल्ला खानही विजयी
शाहीनबाग आणि जामिया विद्यापीठ हा संवेदनशील भाग ज्या ओखला मतदार संघात येतो, त्या मतदार संघातूनही आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानुतुल्ला खान विजयी झाले आहेत.सुरूवातीला तेही काहींसे पिछाडीवर होते पण नंतर त्यांनी ही पिछाडी भरून काढली. शाहीन बाग आणि जामिया विद्यापीठात गेले अनेक दिवस सीएए, एनआरसी विरोधात निदर्शने सुरू आहेत आणि भाजपने शाहीनबागेचा विषय निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता. पण अखेर अमानुतुल्ला खान यांनी तेथून विजय मिळवला. याविषयी दिलेल्या प्रतिक्रीयेत अमानुतुल्ला खान यांनी म्हटले आहे की, ओखला की जनताने करंट लगा दिया है.
दिल्लीत आम आदमी पक्षाला एकतर्फी यश मिळत असताना त्यांचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मात्र विजयासाठी अखेर पर्यंत झुंजावे लागले. भाजपचे उमेदवार रविंदरसिंग नेगी यांनी त्यांना कडवी झुंज दिली. सुरूवातीच्या काहीं फेऱ्यांमध्ये सिसोदिया मागे होते. त्यामुळे या मतदार संघाच्या मतमोजणीविषयी विलक्षण कुतुहल निर्माण झाले होते. पण अखेरीला मनिष सिसोदिया हे दोन हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले. दिल्लीत अनेक मतदार संघांमध्ये सुरूवातीला दिसणारी चुरस नंतरच्या फेऱ्यांमध्ये मावळत गेली आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजय मिळवत गेले.
आम आदमी पक्षाच्या आणखी एक प्रभावी नेत्या अतिशी यांनाही सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये झुजावे लागले. त्याही सुरूवातीला पिछाडीवर होत्या पण नंतर मात्र त्यांनी तब्बल दहा हजार मतांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात पिछाडीवर गेल्याने आपण निराश होतो असे त्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले पण आपला केजरीवालांच्या करिष्म्यावर विश्वास होता. आणि हाच विश्वास खरा ठरला अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. देशात सध्या विविध ठिकाणी सीएए कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या अनुषंगाने मोदी सरकारच्या विरोधात मोठी निदर्शने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काय निकाल येतो या विषयी देशभर कमालीचे औत्स्युक्य होते.