कोरेगाव, (प्रतिनिधी) – महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कटगुण येथे अभिनव पद्धतीने मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी महात्मा फुले यांच्या कवितांचे वाचन करून त्या अनुषंगाने लोकशाहीचे आणि जनमताचे महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी जनजागृती पथकाचे प्रमुख तथा कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी सविस्तरपणे महात्मा फुलेंचे कार्य आणि तदनुषंगाने लोकशाहीचे आणि मतदानाचे महत्त्व यांची सांगड घालत मनोगत व्यक्त केले. यावेळी कटगुणचे तलाठी अमोल जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री.क्षीरसागर म्हणाले, “धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी!”अशा रचनांमधून महात्मा फुले यांनी भेदभाव नष्ट करण्याची शिकवण दिली. जन्मताला महत्त्व दिले. आज लोकशाही आणि मतदान याद्वारे आपण समता प्रस्थापित करू शकतो. जास्तीत जास्त मतदान होणे अत्यावश्यक आहे .महान व्यक्तींना तीच खरी आदरांजली ठरेल. कारण जास्तीत जास्त मतदान होणे म्हणजे लोकशाहीचे बळकटीकरण आहे. १०० टक्के मतदान ही आदर्श अवस्था आपण निर्माण करायला हवी.
21 व्या शतकामध्ये हेच महत्त्व अबाधित राखायचे असेल तर मतदान उत्कृष्ट व्हायला हवे.मतदानाचा अधिकार हा आपल्याला दिलेला खूप मोठा अधिकार असून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे देश बळकट होईल. आपल्याला योग्य सुविधा हव्याअसतील तर; मतदान केल्यावर आपल्याला नागरिक म्हणून त्या सुविधांबाबत व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे शंभर टक्के मतदान हे आपले ध्येय असायला हवे, असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. या उपक्रमाला समन्वय अधिकारी सुजिकुमार इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. तलाठी अमोल जाधव यांनी आभार मानले.