कातरखटाव (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या कातरखटाव ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल्सची बांधणी सुरू आहे. ही निवडणूक चुरशीची होणार, हे निश्चित आहे. भेरवनाथ, कात्रेश्ववर, हनुमान आणि महालक्ष्मी या चारही वॉर्डांमध्ये आजी-माजी सदस्यांनी दंड थोपटले आहेत.
काही नवे चेहरेही दिसत आहेत. त्यामुळे मतदारराजा नक्की कुणाला कौल देणार, याची चर्चा होत आहे.
कातरखटावमध्ये मागील निवडणूक चुरशीची झाली होती. राजकारणात पहिल्यांदा उडी घेतलेल्या उद्योजक तानाजी बागल यांनी जानाईदेवी ग्रामविकास पॅनेलची स्थापना केली होती.
नवख्या उमेदवारांना घेऊन 11 पैकी नऊ जागा जिंकल्या होत्या. प्रतिस्पर्धी अजितराव सिंहासने यांच्या श्री कात्रेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता; परंतु या निवडणुकीत कात्रेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी “हम किसीसे कम नही’, असे म्हणत कंबर कसली आहे. या पॅनेलकडून तगड्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
गेल्या पाच वर्षांमध्ये तानाजी बागल यांनी विकासकामांवर जोर दिला होता. गावातील अंतर्गत रस्ते, पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. काही ठिकाणी पदरमोड करून विकासकामे केली. यावेळी ते नवे-जुने मावळे घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
गेल्या दोन वर्षांत विकास सोसायटीमध्ये कार्यकर्ते फोडाफोडीचे राजकारण रंगले होते. त्यावरून अजितराव सिंहासने आणि सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्यात फूट पडली. त्यानंतर तानाजी बागल व बाळासाहेब पाटील यांची युती झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत नक्की कोणाचे पारडे जड असेल, हे येणारा काळ ठरवणार आहे.