नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या धाडसाचा आणि शौर्याचा दिवस म्हणून कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करण्यात येतो. पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारत भारतीय सैन्याने आपल्या भूमिचे रक्षण केले. त्याच्याच स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाचा आज शेवट होणार आहे. दिल्लीच्या इंदीरा गांधी इंडोर स्टेडिअमवर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात देशाला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. या कार्यक्रमात कारगिल युद्धावर तयार करण्यात आलेली एक छोटी चित्रफीतदेखील दाखवण्यात येणार असून सोबत सैन्याचे बॅंड पथक आपले प्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसाच्या आठवणींना उजाळा देत कारगिल यात्रा ही आपल्यासाठी अविस्मरणीय होती असे म्हटले आहे.