सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेपोटिजमच्या मुद्यावरून ट्रोल होतोय. सोशल मीडियावर तर त्याच्याविरोधात नेटक-यांनी मोठी मोहिमच उघडली आहे. अशात चहूबाजूंनी कोंडी झालेल्या करण जोहरचे नाव ‘सूर्यवंशी’ या आगामी सिनेमातून काढून टाकण्यात आल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
IMPORTANT… News doing the rounds of #KaranJohar not being part of #Sooryavanshi is untrue, clarifies #RelianceEntertainment. pic.twitter.com/0IT9qnNdyS
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2020
करण हा अक्षय कुमार स्टारर ‘ सूर्यवंशी’चा निर्माता आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येनंतर करणविरोधात सुरु झालेली मोहिम बघता, दिग्दर्शक रोहित शेट्टी व अभिनेता अक्षय कुमारने करणला त्याचे पैसे परत करत ‘सूर्यवंशी’पासून दूर केल्याची बातमी आली आणि सगळीकडे खळबळ माजली. बघता बघता ही बातमी सोशल मीडियावर व्हायरलही झाली. करण जोहरवरचे नेपोटिजमचे आरोप, त्याच्याविरोधात सोशल मीडियावर सुरु असलेली मोहिम आणि सुशांतच्या चाहत्यांचा संताप बघता अनेकांचा या बातमीवर विश्वास बसला. मात्र काहीच तासांत ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले.
फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श याने करणला ‘सूर्यवंशी’तून बाहेर काढण्यात आल्याची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. करण जोहर ‘सूर्यवंशी’तून बाहेर पडला ही बातमी खोटी आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटने तसा खुलासा केला असल्याचे तरण आदर्श यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये सांगितले.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार लीड भूमिकेत आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाकडे अनेक चाहते नजरा लावून बसले आहेत. मात्र कोरोन व्हायरस व लॉकडाऊनमुळे अद्याप हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. आता हा सिनेमा यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.