कराड – करोना महामारीचा यंदाचा गणोशोत्सवावर चांगलाच परिणाम झाला आहे. अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत असलेला उत्सवात आवश्यक ती सर्व काळजी घेत बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे “श्रीं’च्या आगमनावेळी कराड शहरात कोठेही गर्दी दिसून आली नाही. प्रत्येक जण तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करत श्रींची मूर्ती घेऊन जाताना दिसत होते.
गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. बुध्दीचं दैवत असलेल्या विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न झालं आहे. पंचागानुसार, शुभ मुहूर्तावरच गणेशाच्या मूर्तीची स्थापला घरी करावी. दि. 22 ऑगस्ट 2020 म्हणजेच, शनिवारी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मूहुर्त पंचांगानुसार, अत्यंत सुक्ष्म आहे. या शुभ वेळी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रत्येकाची लगबग दिसून आली.
करोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रशासनाने गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला कराडकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. गणेश चतुर्थीच्या पूर्व संध्येला बहुतांश लोकांनी गर्दी न करता गणेशमूर्ती आपल्या घरी नेऊन ठेवल्या. तर अनेक गणेश भक्तांनी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत गणेशमूर्ती नेहून प्राण प्रतिष्ठापना केली.
याशिवाय सकाळपासूनच लांब गावच्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबध्दपणे शासनाच्या आदेशाचे पालन करत गणेश मूर्ती नेल्या. सायंकाळच्या गोरजमुहूर्तावर मोठ्या भक्ती भावने श्रींची प्राण प्रतिष्ठापना केली.
दरम्यान, कृष्णा-कोयना नदीला येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन येथील कुंभार समाजाला रूक्मिणीनगर येथे जागा देण्यात आली. मात्र, तेथील गैरसोईमुळे कुंभार समाजाने जागा मिळले तेथे आपली शेड थाटली आहेत. त्यामुळे शहरात एका विशिष्ठ ठिकाणी गर्दी दिसून आली नाही. मात्र, कोणतीही आगमन मिरवणूक नाही. ना बॅंड ना बाजा अगदी साध्या पध्दतीने श्रींचे आगमन झाले.
मूर्तीकारांचे लाखों रूपयांचे नुकसान
कुंभार तसेच मूर्तीकारांसाठी गणेशोत्सव हा सर्वात मोठा व्यवसाय मानला जातो. मात्र, यंदा या व्यवसायाला करोनाचे ग्रहण लागले. महामारीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली. तसेच उत्सव काळातील गर्दी टाळण्यासाठी लोक मर्यादा घालत महामारीमुळे “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात आली. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनी मूर्ती रद्द केल्या. यामुळे कुंभार समाजासह मूर्तीकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखोंचा फटका बसला आहे.