सध्या अमेरिकेत करोनाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांकडून करण्यात आलेल्या निर्घृण हत्येनंतर देशभरात हिंसाचार भडकला आहे. या घटनेनंतर जगात Black Lives Matter कॅंपेन सुरू झाले. हॉलीवूड पाठोपाठ बॉलीवूड स्टार्स प्रियांका चोप्रा, करिना कपूर-खान, दिशा पटनी, करण जोहर या कलाकारांनी देखील या कॅंपेनला पाठिंबा देत, सोशल मीडियावर कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवर दुःख व्यक्त केले. यावरून आता अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा बेधडक असे वक्तव्य करत कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला आहे.
एका मुलाखतीत कंगना म्हणाली, देशात काही आठवड्यांपूर्वी साधूंची हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणीही बोलले नाही. हे महाराष्ट्रात घडले, जेथे सर्वाधिक कलाकार राहतात. बॉलीवूड हे असेही हॉलीवूडकडून घेतलेले नाव आहे. हे कलाकार चर्चेत असलेल्या गोष्टीवर बोलतात. याद्वारे त्यांना दोन मिनिटांसाठी प्रसिद्धी मिळते. मात्र, गोरे लोक हे कॅंपेन चालवत असतात. कदाचित त्यांच्यात स्वातंत्र्याच्या पूर्वीची गुलामी अजून आहे.
कंगना म्हणाली की, पर्यावरणाच्या मुद्द्यावरदेखील हे कलाकार एका श्वेतवर्णीय मुलीला पाठिंबा देतात. मात्र, अनेक महिला आणि मुले आहेत जे भारतात पर्यावरणासाठी कोणाचीही मदत न घेता अविश्वसनीय काम करत आहेत. काही जणांना तर पद्मश्रीदेखील मिळाला आहे. मात्र, कलाकारांकडून त्यांना कधी पाठिंबा मिळत नाही. कदाचित साधू आणि आदिवासी लोक बॉलीवूड आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आकर्षक नसतील, असे खडेबोल कंगनाने सुनाविले.