अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने हिंदी सिनेसृष्टीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बॉलीवूडमध्ये स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचले जाते, तसेच बॉलीवूडमधील कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनाने केली आहे.
यासंदर्भातील एक व्हिडीओ कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर निशाणा साधला. कंगना म्हणाली, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांना हादरा बसला आहे. पण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाची ज्या व्यक्तीने स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचे मानसिक संतुलन कसे बिघडलेले असू शकते?
त्याच्या गेल्या काही दिवसातील पोस्ट पाहिल्या, तर हे दिसून येते की तो सर्वांना विनवणी करत आहे, की माझे देखील चित्रपट पाहा, माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकतील. हे त्याने त्याच्या मुलाखतींमध्येही वारंवार सांगितले आहे की, मला ही इंडस्ट्री स्वीकारत का नाही? मला एकटे पडल्यासारखे वाटते आहे. हा या दुर्घटनेचा पाया तर नाही ना? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.