पुणे -पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात आताची भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) जणू आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे चित्र आहे. पक्षाचे प्रमुख नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गेल्या महिनाभरात नांदेड जिल्ह्याचे दोन दौरे केले आहेत. आगामी काळात हा पक्ष लातूरसह मराठवाड्यातील अन्य जिल्हे, विदर्भात चंद्रपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर भागांत विस्तारण्याची व्युहरचना केली जात आहे.
महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा इरादा “केसीआर’ यांनी नुकत्याचा झालेल्या जाहीर सभांमध्ये बोलून दाखवला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पक्षाची पाऊले पडत आहेत. तर, “अब की बार, किसान सरकार’ ही घोषणादेखील त्यांनी नांदेडमधील सभेत केली. त्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच “केसीआर’ यांचे राजकारण असणार आहे, हे निश्चित आहे. आपल्या भाषणांतून “केसीआर’ यांनी काही विकासात्मक बाबी जनतेसमोर मांडल्या. त्यात पाणी, सिंचन, वीजपुरवठा, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आदी मुद्दे मतदारांना प्रभावित करणारे ठरू शकतात. महाराष्ट्रात प्रांत, सीमा आणि भाषा हे मुद्दे मात्र “केसीआर’ यांना प्रतिकूल ठरू शकतात, अशीही चर्चा आहे. पण, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर “केसीआर’ महाराष्ट्रात आल्याने इतर राजकीय पक्षांसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्राकडेही लक्ष
“केसीआर’ यांनी सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडेही “लक्ष’ देण्यास सुरुवात केली आहे. हा भाग प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून या भागांतही विस्तार करण्याचे “बीआरएस’चे ध्येय आहे.
नांदेडच का?
काही वर्षांपूर्वी हैदराबादच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात “एंट्री’ केली, ती नांदेड मनपा निवडणुकीच्या माध्यमातून. या जिल्ह्यांत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या संस्कृतीशी संबंध असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषत: धर्माबाद, बिलोली, देगलूर हे तालुके तेलंगणाच्या सीमावर्ती भागांत आहेत. त्याचा फायदा घेत वाटचाल करण्याचा “केसीआर’ यांचा इरादा आहे.