पुणे/आंबेगाव बुद्रुक – संतोष कचरे – स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहराचा विकास होत असताना उपनगरांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिकेत समावेश होऊन तीन वर्षे झाली तरी लोकप्रतिनिधी व पालिका मात्र या गावांकडे अद्यापही पाठ फिरवत आहेत. समाविष्ट गावांचा विकास करण्यात पालिकेला अपयश आल्याचे या गावांतील समस्यांतून दिसते. विशेष म्हणजे निवडून दिलेले दोन नगरसेवक आणि भावी नगरसेवक म्हणून मिरवणारी नेतेमंडळी पालिकेकडून विकासकामे करून घेण्यात कमी पडत आहेत.
पुणे महानगरपालिकेत चार वर्षांपूर्वी लगतच्या 11 गावांचा समावेश करण्यात आला. सध्या, या गावांचे प्रतिनिधी म्हणून दोनच नगरसेवक कार्यरत आहेत. तर त्या-त्या गावात भावी नगरसेवक म्हणून मिरवणाऱ्यांची संख्या प्रत्येक वॉर्डानुसार 10 अशी आहे, अशा स्थितीतही उपनगर म्हणून उल्लेख होत असलेल्या या परिसरांचे गावपण अजून गेलेले नाही. या गावांतील मूलभूत समस्याच अद्याप सुटलेल्या नाहीत. ग्रामपंचायतीची वर्षाची घरपट्टी जाऊन आता पालिकेचा टॅक्स आला आहे. एवढाच बदल या गावांतील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
पालिकेतील समावेश झालेल्या उपनगरांपैकी सर्वात मागे पडलेला भाग म्हणून आंबेगाव खुर्दचा उल्लेख केला जातो. या भागात नियोजनशून्य कारभार सुरू असून दाटीवाटीने आणि आडमाप बांधकामे उभी राहत असल्याने आगामी काळात वीज, पाणी, रस्ते अशा सुविधा पोहचवितानाही प्रशासनापुढे अडचणी उभ्या राहणार आहेत.
या भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. तर, एकही सांडपाणी, मलवाहिनी नसल्याने रस्त्यांचीच गटारे झाली आहेत. ग्रापंचायतीच्या काळात केलेली गटारे गेल्या चार वर्षात तुंबली आहेत. यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरूनच वाहत असते. कचऱ्याचे लागलेले ढिग त्याठिकाणी वाढलेला डुकरांचा वावर यामुळे या परिसराची अक्षरश: रया गेली आहे. यातून या परिसरात आरोग्याचा प्रश्न बिकट झाला असून पालिकेकडे तक्रार करूनही प्रशासाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. तर, असलेले दोन नगरसेवक कोठे कोठे पुरणार? शिवाय, आगामी निवडणुकीची वाट पाहणारे भावी नगरसेवकही याकामी कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.