कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मानसिकता हिंदू विरोधी आहे आणि त्या अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबत आहेत, अशी टीका भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भ्रष्ट सरकार सत्तेवर असून शांतिनिकेतन इथे विश्व भारती विद्यापीठामध्ये भूमाफियांना पाठिंबा देऊन रविंद्रनाथ टागोर यांचा वारसा तृणमूल कॉंग्रेसच्या सरकारने धुळीला मिळवला आहे, अशी टीकाही नड्डा यांनी केली.
‘जेव्हा सर्व देश अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पाहत होता, तेव्हा या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होऊ नये, म्हणून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन लागू केला होता. दुसरीकडे बकरी ईदच्या निमित्ताने लॉकडाऊन उठवला गेला. यातूनच राज्य सरकारचे धोरणच हिंदू विरोधी असल्याचे दिसून येते,’ असे नड्डा म्हणाले. भाजपच्या राज्य पातळीवरील नवनियुक्त कार्यकारिणीला ऑनलाईन संबोधित करताना ते बोलत होते.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्या होत आहेत. भाजपच्या 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यानंतरही लोकशाहीचे तथाकथित समर्थकांकडून मौन कसे बाळगले जात आहे, असा प्रश्नही नड्डा यांनी उपस्थित केला.