नवी दिल्ली – प्रख्यात वकिल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्या प्रकरणात न्यायपालिकेने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याची टिप्पणी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. न्याय हा सगळ्यांना समान, संतुलीत आणि निष्पक्ष स्वरूपाचा असला पाहिजे, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या संदर्भात ट्वीट केले होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमानना प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यांना शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र आपले म्हणणे मांडण्यासाठी भूषण यांना आणखी संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, कायदा हा सगळ्यांना समान आणि निष्पक्ष व संतुलीत असला पाहिजे. काही माजी न्यायाधीशांनीही हाच विषय उपस्थित केला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, लोकशाही व तिच्या मूल्यांच्या रक्षणासाठी टीका ही आवश्यक असल्याची भूमिका प्रशांत भूषण यांनी मांडली आहे.
आपण केलेले ट्वीट हे न्यायपालिका अधिक चांगली व्हावी या उद्देशाने केलेला प्रयत्न होता. आपण त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहोत मात्र माफी मागणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यपालनाचा भाग म्हणून आपले ते ट्वीट होते व ते अवमाननेच्या कक्षेच्या बाहेर आहे, असाही त्यांचा दावा आहे.
प्रशांत भूषण यांना याबद्दल फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. मात्र यावर आपण फेरविचार करू तथापि, त्यात फार विशेष बदल होणार नाही. मी न्यायालयाचा फार वेळ वाया घालवू इच्छीत नाही. मात्र माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि विचार करेन, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले होते.