राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) – राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तरप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने परराज्यात जाऊन ही कामगिरी केल्याने त्यांच्यासह पथकाचे कौतुक होत आहे.
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांना ठार मारले होते. राहुरी पोलीस स्टेशनला या संदर्भात दातीर यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी खून प्रकरणातील संशयित आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25, रा. जुने बस स्टँड जवळ, एकलव्य वसाहत, राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21, रा. राहुरी फॅक्टरी, ता.राहुरी) या दोघांना यापूर्वीत अटक केली होती.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच त्यांनी गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय 46) यास नगर-औरंगाबाद रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेलमधून अटक केली होती. परंतु, यातील संशयित आरोपी अक्षय कुलथे हा घटना घडल्यापासून पसार होता. पोलीस उपाधीक्षक मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्यास उत्तरप्रदेशमधील चटिया (ता. बीनंदनकी, जि. फत्तेपूर) येथून शिताफीने अटक केली. संशयित आरोपी अक्षय कुलथे याच्यावर यापूर्वीचे विविध गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, उपनिरीक्षक नीरज बोकील, सहायक फौजदार राजेंद्र अरोळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, कॉन्स्टेबल फुरकान कॉन्स्टेबल शिवाजी खरात, कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे आदींनी ही कारवाई पूर्ण केली.