नवी दिल्ली – दिल्लीलगतच्या सिंघू सीमेवर शहीद शेतकऱ्यांसाठी स्मारक बांधण्याची संयुक्त किसान मोर्चाची योजना आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध करण्याची मागणी मोर्चाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून केली आहे.
मोदी सरकारने आणलेले केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काही काळापूर्वी शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवर तीव्र आंदोलन केले. त्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले. आंदोलन काळात विविध कारणांवरून काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांचा उल्लेख त्या मोर्चाकडून शहीद शेतकरी म्हणून केला जातो. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्याची मोर्चाची योजना आहे.
प्रस्तावित स्मारकासाठी जमीन मिळवण्याच्या उद्देशातून मोर्चाने थेट राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील स्थितीबाबतही मोर्चाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊले उचलली जावीत.
त्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवले जावे, अशा मागण्याही पत्रातून करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देश ढवळून काढणारे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलन वर्षभरापेक्षा अधिक काळ चालले. सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर दिल्लीच्या सीमांवरील ते आंदोलन थांबले.