पुणे – सदाशिव पेठेत मंगळवारी २७ जून रोजी एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत त्या मुलीचे प्राण वाचवले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असे या दोन तरुणांचे नाव आहे. सध्या राज्यभरातून या दोघांचे कौतुक केले जात आहे. अशात उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या दोघांना कॉल करत त्यांचे कौतुक केले आहे.
कोयता हल्लेखोरांच्या तावडीतून तरुणीला वाचवणाऱ्या या दोघा धाडसी तरुणांचे विविध सामाजिक संस्थांनी कौतुक करत सत्कार देखील केले. अशात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून दिला असता फडणवीस यांनी या दोन्हही तरुणांशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी लेशपालने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलताना म्हणाला,धन्यवाद. तुमचा फोन आला आणि तुम्ही आमच्याशी बोलत आहात खूप छान वाटत आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना दोन्हही तरुणांनी फडणवीसांच्या कौतुकाचा स्वीकार करत त्यांचे आभार मानले. त्यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
काय घडलं होत नेमकं त्यावेळी
आरोपी शंतनु जाधव तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.