surat diamond bourse – सुरतमधील भव्य हिरे बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे (Surat Diamond Bourse) 17 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले होते. सुरतमधील हिरे बाजार हा केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा फार महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. मात्र याच प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय किरण जेम्स कंपनीने घेतला आहे. ही कंपनी पुन्हा मुंबईतून आपला कारभार सुरु करणार आहे.
सुरत हिरे बाजारामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून किरण जेम्स कंपनीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बाजाराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागजीभाई सकारिया यांनी मागील आठवड्यातच पदाचा राजीनामा दिला. अशात आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर सविस्तर मजकूर आणि त्यासह वृत्तपत्राचे कात्रण शेअर केले आहे.
देशाच्या प्रगतीसाठी अर्थकारण गरजेचं असतं. उद्योगधंद्यांची वाताहत, वाढती बेरोजगारी, श्रीमंत-गरीबांमधील वाढणारी दरी पाहता विद्यमान सरकारला त्यातलं किती कळतं, हा प्रश्नच आहे.
कोणत्याही शहराला आर्थिक केंद्र प्रस्थापित करण्यासाठी इतिहास, भौगौलिक पार्श्वभूमी आणि सामाजिक परिस्थिती… pic.twitter.com/m4wgr7EZD3
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2024
जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की,’देशाच्या प्रगतीसाठी अर्थकारण गरजेचं असतं. उद्योगधंद्यांची वाताहत, वाढती बेरोजगारी, श्रीमंत-गरीबांमधील वाढणारी दरी पाहता विद्यमान सरकारला त्यातलं किती कळतं, हा प्रश्नच आहे. कोणत्याही शहराला आर्थिक केंद्र प्रस्थापित करण्यासाठी इतिहास, भौगौलिक पार्श्वभूमी आणि सामाजिक परिस्थिती महत्त्वाची असते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि जगाच्या नकाशावर दिमाखात मिरवण्यामागे भौगोलिक स्थान, लोकांचे परिश्रम आणि इथलं व्यवसायभिमुख वातावरण कारणीभूत आहे. त्याचं महत्त्व फक्त भव्यदिव्य इमारती बांधून कमी करता येणार नाही.’
ते पुढे लिहितात की,’मुंबईवरील सूड उगवण्यासाठी येथील प्रस्थापित हिरे बाजार सूरतला नेण्याचा आखलेला डाव कसा फसलाय याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रात झळकतायत. ‘किरण जेम्स’ या हिरे बाजारातील सर्वात मोठ्या कंपनीने आता पुन्हा एकदा आपली पसंती मुंबईला दिली असून आपला संपूर्ण व्यवस्या मुंबईतूनच करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. सूरत डायमंड बोर्समध्ये गेलेल्या सर्व कंपन्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल, याची आम्हाला कल्पना आहे. मुंबईने व्यापा-यांचा कायम आदर केलाय, म्हणूनच सर्व हिरे व्यापा-यांचं आम्ही पुन्हा एकदा मुंबईत स्वागत आणि अभिनंदन करतो. मराठीत एक म्हण आहे “सरड्याची धाव कुंपणापर्यंतच…” कुणी कितीही आदळाआपट करा… मुंबईची सर भारतातील कुठल्याही शहराला येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे…’ असं लिहीत मोदी सरकार टीका केली आहे.