इस्लामपूर – ज्यांच्या संकल्पना व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना गेल्या पंचवीस दिवसांपासून “माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे अशा ना. जयंतराव पाटील यांनी शहरातील वेग-वेगळ्या भागातील “कम्युनिटी किचन’ला भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत, काही केंद्रावर त्यांनी “वाढप्या’ची भूमिका वठविली. यावेळी त्यांनी जीवाची पर्वा न करता राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ना.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15-20 दिवसा पासून शहराच्या वेग-वेगळ्या 9 भागात ‘कम्युनिटी किचन’ सुरू करून गरजूंना ‘माणुसकीची थाळी’ जेवू घातली जात आहे. कोरोनाच्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या असंख्य नागरिक,व परराज्यातील मजुरांचे हाल सुरू झाल्याने ही किचन सुरू केली आहेत.
ना. पाटील यांनी आंबेडकर नगर, मंत्री कॉलनी, राजेबागेश्वर, मार्केट यार्ड, भाजी मंडई, घरकुल आदी भागातील कम्युनिटी किचनला भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, नगरसेवक विश्वनाथ डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासो पाटील होते.
याप्रसंगी ना. पाटील यांनी काही केंद्रावर स्वतः लोकांना जेवण वाढले. तसेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत जेवणाच्या दर्जा, प्रमाणाबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली.