वैकुंठ स्मशानभूमी येथे असंवेदनशीतलेचा कळस
पुणे – करोनाच्या साथीमुळे सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थितीची बंधने आहेत. त्यामुळे अशा प्रसंगी काळजावर दगड ठेऊन आप्तेष्टांवर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. त्यातच वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना राडारोड्याच्या गराड्यात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनी परिसरातील प्रार्थना हॉल विस्तारीकरणासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीत उभे राहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.
वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युतदाहिनीच्या बाजूला मोठा प्रार्थना हॉल आहे. त्याचे विस्तारीकरण भवन विभागाने आठ महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये हे काम बंद झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. ते करताना या हॉलचे फ्लोरिंग तसेच भिंती फोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर हे काम पुन्हा बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे हा संपूर्ण हॉलच उखडून ठेवण्यात आला आहे. परिणामी, विद्युत दाहिनी येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना या राडारोड्यातून पार्थिव घेऊन दुसऱ्या बाजूच्या हॉलमध्ये प्रार्थनेसाठी जावे लागते. अथवा, येथील रॅंम्पवर पार्थिव ठेऊन दाटीवाटीने उभे राहून प्रार्थना करावी लागती. अशा परिस्थितीत या वेळी फिजिकल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. एका बाजूला करोनामुळे मनात धास्ती असताना, दुसऱ्या बाजूला जवळच्या व्यक्तींसाठी अंत्यविधीला आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या दुरवस्थेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वैकुंठ ही सर्वांत मोठी स्मशानभूमी असल्याने आणि ही 24 तास सुरू असल्याने येथील कर्मचारी या हॉलमध्येच रात्री मुक्कामी असतात. मात्र, हा हॉल खोदल्याने या कर्मचाऱ्यांनाही रॅम्पमध्ये झोपण्याची वेळ आली आहे. या हॉलची तातडीने दुरूस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
विद्युत दाहिनीलाच प्राधान्य
लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे बहुतांश नागरिक नातेवाईकाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी विद्युत आणि गॅस दाहिनीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विद्युतदाहिनी 24 तास सुरू असून, येथे नागरिकांची ये-जा सुरू आहे. तर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट दिल्यानंतर या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती.
माजी महापौरांच्या विकास निधीतून येथील हॉलचे विस्तारीकरण सुरू होते. लॉकडाऊनमध्ये हे काम बंद पडले. त्यानंतर पुन्हा सुरू केले होते. मात्र, मजूर तसेच अत्यावश्यक साहित्य नसल्याने ते बंद आहे. या कामास उशीर होणार असल्याने उद्यापासून तातडीने या उखडलेल्या फ्लोरिंगचे काम सुरू करून हॉल नागरिकांना उपलब्ध करून दिला जाईल. तसेच लॉकडाऊननंतर हे काम पूर्ण केले जाईल.
– शिवाजी लंके, भवन विभाग प्रमुख, मनपा