Sanjay Raut; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने कंबर कसली असून एक मोठा डाव आखला आहे. भाजप मित्रपक्षसोबत मिळून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे तर दुसरीकडे इंडियामध्ये सर्व विरोधी पक्षाचे नेते जागा वाटपावर चर्चा करत आहे. नुकतेच अमित शाह यांनी घराणेशाहीवर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं. घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले’, अशी टीका अमित शाह यांनी केली. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
“अमित शाह यांचे घराणेशाहीवरील वक्तव्य हास्यास्पद आहे. जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का? जय शहा गृहमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर ठोकल्या, सचिनेपक्षा जास्त शतकं केली की कपिल देव यांच्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या? असा सवाल राऊत यांनी विचारला.
पुढे ते म्हणाले, “घराणेशाही तेव्हा म्हटली जाते जेव्हा घराण्याला प्रतिष्ठा असते. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला, या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे. कारण या दोन्ही घराण्यांनी देशाला, महाराष्ट्राला, समाजाला खुप काही दिलं आहे. ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी ठाकरे कुटुंबांचं मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे,” असेही संजय राऊत म्हणाले यावेळी राऊत यांनी अमित शहा यांना प्रधानमंत्री बनायचे आहे. पण सत्तेचा सारीपाट तुमच्या इशाऱ्यावर चालणार नसल्याचे सांगितले.