मेढा – करोनावर मात करण्यात जावळी तालुका यशस्वी ठरला आहे. जावळी तालुक्यातील एकूण सहा रुग्णांपैकी यापूर्वी तीन करोनामुक्त झाले होते. तर इतर तिघांचेही रिपोर्ट बुधवारी निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जावळीकरांना ही बाब दिलासा देणारी असली तरी पुढील काळात तासुक्यात ओलेल्या व येणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांकडून दक्षता ठेवण्याची गरज भासणार आहे.
जावळी तालुक्यात प्रशासनाने केलेली काटेकोर अंमलबजावणी व जावळीकरांचे या लढ्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरले. जावळी तालुक्यात आढळलेल्या सहा रुणांपैकी पहिले तीन रुग्ण असलेले वडील, मुलगा व चुलत भाऊ असे करोनामुक्त झाले होते. त्यांच्या संपर्कातील तीन जणांचे अहवाल अद्याप बाकी होते. त्यांचेही चित्र आज स्पष्ट झाले असल्यामुळे जावळी तालुका करोनामुक्त झाला आहे. निझरे येथील खासगी कारचालक पाच एप्रिल रोजी करोना पॉझिटिव्ह आल्यापासून करोनाची जावळीतील साखळी सुरू झाली.
या पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील 47 जणांना क्वारंटाइन केले होते. त्यातील म्हाते मुरा येथील एक जण पॉझिटिव्ह आला. यातील 46 जणांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांत त्याचा मुलगा पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 27 जणांना क्वारंटाइन करून त्यांच्या टेस्ट घेतल्या.
त्यामधे पुन्हा दोन जण पॉझिटिव्ह आले. क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने हे दोन्ही युवक संपर्कात आले होते. त्यामधील 25 जणांना घरी सोडले आहे. पुन्हा या दोघांच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या सर्वांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जावळी तालुका करोनामुक्त झाला असून प्रशासनाचे जावळीकरांकडून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार शरद पाटील यांनी 100 टक्के लॉकडाउन केल्याचा चांगला फायदा होऊ लागला असून, मेढ्यासह इतर गावांत होणाऱ्या अनावश्यक गर्दीला आळा बसलेला आहे. तसेच गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.