Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २५ ऑक्टोबर पासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याआधी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन 14 सप्टेंबरला 17 दिवसांचे उपोषण सोडले. यावेळी मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता. मात्र 40 दिवसांनंतरही सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान ‘माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होऊ शकत नाही’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर आता मनोज जरांगे पाटलांनी थरथरत्या आवाजात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, जरांगे पाटलांनी म्हणाले,’चर्चेला यावं, मराठे कुठेही आडवणार नाहीत. मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही. फक्त एकदाच चर्चेला येणार की नाही, हे सांगा. बाकीची वळवळ करायची नाही,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले,’सरकारचं कुठंलही उत्तर नाही अथवा संवाद नाही. ३०-३१ ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला.
तत्पूर्वी, राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर पुन्हा जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. जरांगे पाटील यांनी या उपोषणादरम्यान पाणीही घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी पाणी घेतले. पण त्यानंतर पाणीही घेणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले होते. त्यामुळे उपोषणाचा आज चौथा दिवस त्यांची प्रकृती खालावली आहे.