मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्येच मनसेला मोठे खिंडार पडले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातील दोन बडे नेते राज ठाकरेंची साथ सोडून गेले आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर दुसरी कडे डोंबिवलीतले मनसेचे गटनेते मंदार हबळे यांनी भाजपची वाट धरली.
दरम्यान, मनसेच्या या गळतीवर मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. “ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुस-या पक्षात प्रवेश केला की लगेच “मोठी बातमी”असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते..याचा अर्थ त्या पक्षाच्या “असण्याची”सगळे जण दखल घेतात..हो ना?
https://www.facebook.com/sanjay.mone/posts/10159055335839127
याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा..या मधल्या “lock down”च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर)केली ,ते जरा लक्षात ठेवा..माझ्या मतदार संघात ,जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले,त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे..कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते..तर थोडा शब्दप्रयोग बदलतो,तर..आपला हक्क आहे असं समजा…
तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये.फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय..इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती..शेवटी आपण ठरवायचं आहे..जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो )यात निवड करायची आहे..बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका..रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं. या आशयाची पोस्ट संजय मोने यांनी केली आहे.