मुंबई – फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
जलयुक्त शिवार ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना होती. मात्र, या योजनेंतर्गत झालेली कामे अत्यंत खराब दर्जाची होती. यामुळे या योजनेची चौकशी होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे ७२ टीमसी पाणी अडवल्याचे मागच्या सरकारने सांगितले. मात्र, हे केवळ दिशाभूल असल्याचे लोकांच्या देखील लक्षात आले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
यापूर्वी राज्यात जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत. ही योजना जुनीच आहे, मात्र मागच्या सरकारने त्याला जलयुक्त शिवार हे गोंडस नाव दिले, परंतु त्याचा परिणाम काय झाला हे राज्यातील जनतेला कळले आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवण्याचे जलसंधारणाचे काम चालूच राहणार आहे. जलसंधारणाची कामे थांबवली जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.