नवी दिल्ली – तामिळनाडूच्या विविध भागात जल्लीकट्टू स्पर्धा सुरू झाली आहे. अवनियापुरममध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मदुराई येथील जल्लीकट्टू स्पर्धेपूर्वी बैलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जल्लीकट्टूला इरुथाझुवुथल देखील म्हणतात. जल्लीकट्टू हा तामिळनाडूच्या ग्रामीण भागात खेळला जाणारा एक पारंपारिक खेळ आह. यामध्ये माणसे बैलांशी लढतात. जल्लीकट्टू हे तामिळनाडूच्या अभिमानाचे आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते.
या खेळात अनेक वेळा लोक गंभीर जखमी होतात. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने जल्लीकट्टू आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, सर्व व्यवस्था असतानाही जल्लीकट्टू दरम्यान अनेक जण जखमी होतात. गेल्या वर्षी अवनियापुरम परिसरात सुमारे ६० जण जखमी झाले होते.
कसा खेळतात जल्लिकट्टू?
वडी मंजुविरटु हा जल्लीकट्टूची सर्वात सामान्य प्रकार आहे. बैलाला बंद जागेतून सोडले जाते (वडी वासल) आणि स्पर्धक बैलाच्या वशिंडाभोवती आपल्या हाताने मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. यात एका वेळी फक्त एका व्यक्तीला प्रयत्न करण्याची परवानगी आहे. हा प्रकार मदुराई, थेनी, तंजावर आणि सेलम या जिल्ह्यांमध्ये सर्वात सामान्य आहे.
वातम मंजुविराटु
या प्रकारात, बैलाला १५ मीटर (४९ फूट) दोरीने बांधले जाते (तमिळमध्ये वटम म्हणजे ‘वर्तुळ’). बैलासाठी इतर कोणतेही शारीरिक बंधने नाहीत आणि त्यामुळे तो कुठेही मुक्तपणे फिरू शकतो. दिलेला कमाल कालावधी ३० मिनिटे आहे. सात ते नऊ सदस्यांची टीम बैलाच्या शिंगावर बांधलेली बक्षिसाची पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात.