हैदराबाद – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भात अवमानजनक टिप्पणी केल्याबद्दल आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी यांच्या विरोधात तेलंगणातील एका कॉंग्रेस नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अखंड आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनाला सोनिया गांधी आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू जबाबदार असल्याची टिप्पणी स्वामी यांनी केली होती. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
राजशेखर रेड्डी यांचे २००९ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले होते. त्यानंतर आता त्याबाबत नारायण स्वामी यांनी सोनिया आणि नायडू यांना त्यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांची ही टिप्पणी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आक्षेपार्ह ठरवत स्वामींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी चुकीचा दावा करत सोनिया गांधी यांचा अवमान केला आहे असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, नारायण स्वामी यांनी यापूर्वीही कोविडच्या काळात केलेल्या एका विधानामुळे ते अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशात कोविडचा प्रादुर्भाव होण्यास तबलिगी जमात कारणीभूत असल्याचे वक्तव्य केले होते व तेंव्हाही गदारोळ झाला होता. दरम्यान, आता राजशेखर रेड्डी यांच्या कन्येने काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या भावाच्या पक्षाच्या नेत्याने सोनिया गांधी यांच्या संदर्भात विधान केल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जाण्याची शक्यता आहे.