प्रभात ऑनलाइन – कधीतरी आपण आपल्या मुलांवर रागावतो, चिडतो, चारचौघात त्यांच्यावर मोठ्याने ओरडतो. अशावेळी मुलं मनातून खूप दुखावली जातात. या परिस्थितीत मुलांची क्षमा मागून आपण त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवणे गरजेचे असते. यामुळे मुले भावनिकदृष्ट्या मजबूत होतात ज्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत सामना करण्याचे बळ मिळते. बऱ्याचवेळा पालकांना असे वाटते की ते चूक करू शकत नाहीत, मात्र हे पूर्णतः खरे नाही.
अशा परिस्थितीत आपण मुलांचे मन दुखवले किंवा चूक केली तर आपण प्रामाणिकपणे त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. मग ती आपली स्वतःची मुलं असली तरीसुद्धा आपण आपल्या मुलांची माफी मागावी. मात्र, कोणत्या परिस्थितीत आपण मुलांची माफी मागावी, जे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण पालक म्हणून मुलांच्या मनात आदर कायम ठेवू शकू.
प्रश्न असा आहे की मुलांना माफी मागण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे? मुलांची पालकांनी माफी मागितल्याने मुलांच्या मनात आपल्या पालकांबद्दल गैरसमज निर्माण होईल का? तज्ञांचा असा विश्वास आहे की आपल्या मुलांची क्षमा मागण्यात काहीच गैर नाही. परंतु हे कसे आणि केव्हा घडले पाहिजे हे मुलांची स्थिती आणि वय यावर अवलंबून असते.
* कोणत्या परिस्थितीत मुलांची क्षमा मागावी?
खरंतर आपण सर्वांनी कधीतरी आपल्या मुलांवर कधी ना कधी ओरडलेले असतेच. कळत नकळत आपल्याकडून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतात. कधी त्यांची अपेक्षा पूर्ण केली नसेल, अशा चुका झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त केल्याने मुलांशी असलेले आपले नाते दृढ होते. परिस्थिती कशीही असली तरीही, जर आपण मुलांच्या अपेक्षांवर खरे न उतरल्यास त्यांना मोकळ्या मनाने दिलगीरी व्यक्त करावी. काय घडले हे त्यांना समजावून सांगावे आणि आपण हेतूपुरस्सर त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत, याची त्यांना खात्री पटवून द्यावी.
* मुलांशी परिस्थितीबद्दल चर्चा करा
पालकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मुलांना त्यांच्याशी असे वागण्यास प्रवृत्त झालेल्या परिस्थितीबाबत मोकळेपणाने बोला. यामुळे परस्पर सामंजस्य, तारतम्य आणि सुसंवाद वाढेल. भावना समजून घेण्याची क्षमता मुलांमध्ये वाढेल. तथापि, हे करणे सर्व पालकांना सोपे नाही. जर पालक उघडपणे याविषयी मुलांशी चर्चा करण्यास असमर्थ असतील तर ते हे कोणत्याही जवळच्या मित्राद्वारे, नातेवाईकाच्या माध्यमातून किंवा मुलांपैकी एकाद्वारे बोलू शकतात. जर हे शक्य नसेल तर मग आपला मुद्दा लिहून ठेवता येईल.
* मुलांचे विचार ऐका
किशोरवयीन मुलांच्या बाबतीत, त्यांच्या मानसिक अवस्थेतून उद्भवलेल्या विचारांना स्वीकारणे देखील क्षमा करण्याचा एक प्रकार आहे. किशोरांची तक्रार असते की त्यांचे पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करा. त्यांचे विचार, कल्पना, मत जाणून घ्या.
* क्षमा करणे ही एक सामान्य गोष्ट नाही
नकारात्मक भावना देखील जीवनाचा एक भाग असतात. माफी मागण्याचे असे एक वय नाही. मुलांबाबत दिलगीर राहणे म्हणजेच स्वत:चा सन्मान करणे. कारण माफी मागणे ही एक सामान्य गोष्ट नाही. खरोखर चुकलात तर माफी मागा आणि खरेच ‘मोठे’ व्हा!