अहमदनगर : मागील एक वर्षापासून डोकेदुखी ठरत असलेला करोना मध्यंतरी अटोक्यात आल्याचे चित्र होतं. मात्र आता पुन्हा रुग्मसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात सध्या रुग्णवाढ दरदिवशी १००० पर्यंत पोहोचली असून औरंगाबादमध्ये देखील रुग्णवाढीची स्थित गंभीर आहे. या दोन जिल्ह्यात करोना नियमांची कडक अमलबजावणी सुरू असताना आता अहमदनगर जिल्ह्यातून चिंता वाढवणारे वृत्त आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग तिप्पट झाला आहे. गेल्या महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात दिवसाला ४५ करोना रुग्ण आढळून येत होते. आता हाच दर दिवसाला ३६२ पर्यंत गेला आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दरदिवशी दोनशे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात सध्या १६३६ रुग्णांवर उपचार सुरू असून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
दरम्यान करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, नागपूर जिल्ह्यात करोना नियम कडक करण्यात आले आहेत. तर औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे. नगरमध्ये सध्या रात्रीची संचारबंदी करण्यात येत असून सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नसोहळे यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र आणखी रुग्ण वाढल्यास नगरमध्ये काय होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.