एम. डी. पाखरे
आळंदी – संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा।। जावे पंढरीसी आवडे मनासी । कधी एकादशी आषाढी हे।। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (दि. 21 जून) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेकडो दिंड्यांमध्ये लाखों भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. अवघी अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजली आहे.
माऊली मंदिर, इंद्रायणी घाट, सर्व धर्मशाळा, वारकरी आश्रमामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत आहे. दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्यामुळे भाविक, वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी वारीसाठी आलेल्या वारकरी सखुबाई घोंगडे (वय 67, सांगली) म्हणाल्या की, ही माझी 27वी वारी आहे.
गेले दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडला होता. यावर्षी पायी वारी होत आहे याचा खूप आनंद वाटतोय. जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत वारी करणार. दरम्यान, वारीसाठी आलेले लाखों भाविक इंद्रायणीत अंघोळ करतात. पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
भाविक घेताहेत काळजी
करोनामुळे दोन वर्षे वारी खंडित झाली होती. अनेकांनी घरात बसूनच नामस्मरण केले; मात्र काळजी घेत वारकरी वारीत सहभागी होत आहेत. अनेकांनी लसीकरण करूनच वारीत सहभागी झालो असल्याची माहिती दिली. अनेकांच्या तोंडावर मास्क नसले; तरी कापडी गमच्या, तर महिलांकडे स्कार्फ आणि पदर गुंडाळून खबरदारी घेत आहेत. एकंदर भाविक स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. ठिकठिकाणी राहुट्या अन् तंबूतून मुक्काम करत आहेत. धर्मशाळांमधून वारकरी थांबत आहेत. सिद्धबेट, गोपाळपुरा, वडगाव रस्ता भागात वारकऱ्यांची विशेष गर्दी दिसत आहे.